May 15, 2008

आहे मनोहर तरी

इन्जिनीयरिन्गच्या शेवटच्या वर्षाला असतांना "आहे मनोहर तरी" वाचले होते. ते पुस्तक बिलकुल आवडल नव्हते. तसेही आत्मचरित्र वाचण काही खुप आनन्ददायक नसतच. पण आज जेव्हा आठवत तेव्हा सुनीता देशपान्डेन्चे कौतुक वाटते. पुल सारख्या मोठ्या आणि प्रसिद्ध व्यक्तिचे दोष लिहिणे आणि स्वत:चीच टिमकी वाजवणे सोपे नाही.ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा वाटले अगदी नियमितपणे लिहिन पण लिहायला सुरुवात केली तेव्हा जाणवाले हे येड्यागबाळ्याचे काम नाही. माझ्यासारख्या व्यक्तिचे तर मुळीच नाही. खुप लिहावसे वाटत असूनही मी लिहू शकत नाही. खुपदा वाटते "अरेच्च्या हे काय लोकांनी वाचण्यायासारखे नाही" तर कधी वाटते "हे वाचुन लोक काय म्हणतील". असे चारचौघात स्वत:बद्दलाच लिहिण्याइतके धैर्य नाहीच माझ्यात. मी केलेले चांगले काम असो किंवा कुठे झालेले माझे कौतुक असो मला पटकन ते सांगता येत नाही. माझे दु:ख फक्त माझ्याजवळच असते. हा दोषच म्हणाना स्वभावातला. पण असेच आहे करणार तरी काय.वेबदुनियेत एक फेरफटका मरुन पाहिला तर नियमित ब्लॉग लिहिणाऱ्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही. कुणी पिक्चर बद्दल लिहिलय, कुणी वीकेंडला केलेल्या स्वयंपाकाबद्दल. अगदी छोट्या छोट्या सुख, दु:खाबद्दल पण न लाजता कुणी लिहुन काढलय. असे सहज, सुंदर लिहिणे कधी जमणार मला. दिवसभर मी ब्लॉगवर काय लिहु , लिहिले तर कुणी हसणार तर नाही ना हाच विचार मी करत होते. काल रात्री असाच विचार करतांना मला वाटले ब्लॉग मी स्वान्त्सुखाय तर नक्कीच लिहु शकते ना....कोणी वाचुन वाईट म्हणाले तरी व्हर्चुअल दु:ख होईल. इंटरनेटमुळे एक बरय, सुख, दु:ख , मैत्री सगळे काही व्हर्च्युअली. कुठलही दडपण नाही. स्विच ऑफ केले की सगळी नाती बंद मग आपण आपल्या कोषात जायला मोकळे.सगळी नाती अशीच व्हर्च्युअल झाली तर कित्ती बरे ना.... उगाच नको असलेल्या नात्यांची ओझी वाहायला नकोत. नात्याबरोबर येणारे सुख, दु:ख, अपेक्षा, वेदना काही काही नको. तर आता इथे मी लिहित राहिन... जमले तर तुम्ही वाचत राहा.